मुंबई : राज्यातील सोयाबीन व उडीद ही दोन पिके ९० दिवसांसाठी हमीभावाने खरेदी करण्यासाठी केंद्र सुरू करावीत, अशी मागणी कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांनी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे केली होती. त्यासाठी त्यांनी पाठपुरावा देखील केला होता. मात्र आता या पाठपुराव्यास यश आले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने समर्थन मूल्य योजनेच्या अंतर्गत सोयाबीन व उडीद पिके ९० दिवसांसाठी हमीभावाने खरेदी करण्यासाठी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली असल्याचे समजते.
दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान हे राज्य कृषी महोत्सवाच्या निमित्ताने परळीत आले होते. तेव्हा धनंजय मुंडे यांनी याबाबत त्यांच्याकडे मागणी केली होती, तसेच दिल्ली येथे भेटूनही याबाबत पाठपुरावा केला होता. अखेर या मागणीला मान्यता मिळाली आहे.
काय म्हणाले मुंडे?
राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी आणि त्यांचे बाजारभाव पडल्याने नुकसान होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न केले. तसेच खाद्यतेल, सोया मिल्क, सोया केक इत्यादी उत्पादने आयात करण्यावर शुल्क लावावी, सोयाबीन निर्यातीसाठी प्रतिक्विंटल किमान ५० डॉलर इतके अनुदान द्यावे, याबाबत देखील शिवराजसिंह चौहान यांच्याशी चर्चा झाली होती आणि आता यावर देखील सकारात्मक निर्णय होणार असून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ मिळेल, असे मुंडे म्हणाले. तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला लाभ मिळवून देणारा हा निर्णय असून याबद्दल शिवराजसिंह चौहान, तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनःपूर्वक आभार! मानत असल्याचे यावेळी मुंडे म्हणाले.
राज्य सरकारचे अनुदान!
मागील वर्षी सोयाबीन चे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. मात्र त्याही परिस्थितीत धनंजय मुंडे यांनी सातत्याने पाठपुरावा करून राज्य शासनाच्या वतीने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला. यासाठी राज्य सरकारने ४२०० कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून दिले असून येत्या दोन-तीन दिवसात या अनुदानाचे थेट वितरण शेतकऱ्यांच्या खात्यावरती करण्यात येणार असल्याचे समजते.