आरक्षण संपवू देणार नाही, राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या अमेरिका दौऱ्यावर असून एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आरक्षणाबद्दल वेगळे मत व्यक्त केले. जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. पण सध्यातरी अशी स्थिती नाही असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर भाजप आक्रमक झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी टीका करत राहुल गांधींना खडेबोल सुनावले आहे. आरक्षण संपवण्याचा मनसुबा राहुल गांधींनी व्यक्त केला मात्र आम्ही आरक्षण संपवू देणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितले आहे.

दरम्यान, यासंदर्भात एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले, विदेशात जाऊन सातत्याने भारताची येथील नागरिकांची बदनामी करण्याचा उद्योग विरोधी पक्षनेते, लोकप्रतिनिधी राहुल गांधी करतात.

ट्विट करत काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

विदेशात जाऊन सातत्याने भारताची, येथील नागरिकांची बदनामी करण्याचा उद्योग विरोधी पक्षनेते राहुल गांधी करतात. परदेशात जाऊन मनाला येईल ते बरळणे, बेछूट आरोप करणे हे लोकप्रतिनिधीला शोभत नाही. मात्र बोलताना त्यांनी काँग्रेसचा आरक्षणाविरोधी खरा चेहरा उघड केला. आरक्षण संपवण्याचा मनसुबा राहुल गांधी यांनी अमेरिकेत व्यक्त केला असून आरक्षण संपवण्याची त्यांची ही भाषा अत्यंत दुर्दैवी आहे. शिवसेना व महायुतीतील सहकारी पक्ष आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत आणि आम्ही आरक्षण संपवू देणार नाही, याची ग्वाही पुन्हा या निमित्ताने देत आहोत. आरक्षणाला धक्का लावण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही हाणून पाडू, असे शिंदे म्हणाले आहेत.

राहुल गांधी परकीय मानसिकतेला धार्जिणे आहेत!

आपला भारत देश ‘फेअर प्लेस’ नाही, असे परदेशात जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांसमोर बोलणे भारतातील नागरिकांसाठी अत्यंत अवमानकारक आहे. राहुल गांधी हे परकीय मानसिकतेलाच धार्जिणे आहेत, हे या निमित्ताने सिद्ध होते. अनेक सर्वसामान्य भारतीय विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवर आपल्या बुद्धितेजाने लोकांची मने जिंकली आहेत. स्वामी विवेकानंदांपासून ते आजच्या आयटी क्षेत्रातील बुद्धिमंत विद्यार्थ्यांपर्यंत अनेकांनी अमेरिकेत भारताचा ध्वज उंचावला आहे. त्या सगळ्यांचा अवमान राहुल गांधी यांनी केला. देशाचा, आमच्या अस्मितांचा आणि नागरिकांचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही आणि हे आम्हाला मान्यही होणार नाही. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो असे एकनाथ शिंदे स्पष्टपणे म्हणाले.

फडणवीसांची टीका काय?

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राहुल गांधींवर सोशल मीडियावर पोस्ट करत टीका केली आहे. ते म्हणाले, राहुल गांधी यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर नेहमीच देशविरोधी वक्तव्ये केली आहेत. जी कोणत्याही प्रकारे राष्ट्रहिताच्या दृष्टीने नाहीत. आरक्षण संपवण्याबाबत राहुल गांधी यांनी नुकतेच केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात राहुल गांधी आणि काँग्रेसने आरक्षणाबाबत खोटी कथा पसरवली पण आता त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे, असे ते म्हणाले.