नवी दिली : विविध आजार व शस्त्रक्रियांवर ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या आयुष्मान भारत योजनेत ७० वर्षांवरील वृद्धांचाही समावेश करण्याचा निर्णय केंद्र सरकारने आता घेतला आहे. या पार्श्वभूमीवर या योजनेविषयी नव्याने चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे नव्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर योजनेची योग्य माहिती घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
दरम्यान, एकाच कुटुंबातील किती लोक आयुष्मान कार्ड बनवू शकतात? ही सर्वात महत्त्वाची शंका असते. त्यामुळे लोक योजनेपासून वंचित आहेत. खरेतर, एखादी योजना सुरू झाल्यावर तिच्या पात्रतेशी संबंधित निकष जारी केले जातात. कुटुंबनिहाय आयुष्मान कार्डच्या संख्येविषयी देखील यात स्पष्टता आहे. या सरकारी योजनेत गरजूंना सुविधा देण्यासाठी अशी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. याचा अर्थ, एकाच कुटुंबातील सर्व लोक आयुष्मान कार्ड बनवू शकतात, मात्र ते या योजनेसाठी पात्र असले पाहिजेत.
केंद्र सरकारचा कॅबिनेटमध्ये निर्णय काय?
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, आयुष्मान भारत योजनेमध्ये आता ७० वर्षांवरील वयोवृद्ध नागरिक यामध्ये सहभागी होऊ शकतात. तसेच, या निर्णयाचा हेतून ४.५ कोटी कुटुंबांतील ६ कोटी वयोवृद्ध नागरिकांना ५ लाख रुपयांचे मोफत आरोग्य विम्याचा लाभ मिळावा हा होता. सरकारने सांगितले की, या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना एक नवे आणि वेगळे कार्ड जारी केले जाईल. ज्येष्ठ नागरिक सध्या केंद्र सरकारच्या कोणत्याही आरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट असल्यास, त्यांच्याकडे आयुष्मान भारतमध्ये स्विच करण्याचा पर्याय असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही एक्स पोस्टच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.
काय आहेत पात्रतेचे निकष?
ग्रामीण भागात राहणारे, आदिवासी, अनुसूचित जाती किंवा जमातीचे निराधार किंवा अपंग किंवा असंघटित क्षेत्रात काम करणारे किंवा रोजंदारी मजूर म्हणून उदरनिर्वाह करणारे सर्व लोक या योजनेसाठी पात्र आहेत. पात्रतेची माहिती ऑनलाइन देखील मिळवता येते.
आतापर्यंत बनलेत ३४ कोटींहून जास्त कार्ड!
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत बनवल्या जाणाऱ्या आयुष्मान कार्डांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, ३० जून २०२४ पर्यंत आयुष्मान कार्डची संख्या ३४.७ कोटींहून अधिक झाली होती. या कालावधीत १ लाख कोटी रुपयांपर्यंतच्या ७.३७ कोटी आजारी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यास मान्यता देण्यात आली. या योजनेचे लाभार्थी देशभरातील २९ हजारहून अधिक रुग्णालयांमध्ये कॅशलेस आणि पेपरलेस आरोग्य सेवांचा लाभ घेऊ शकतात.
कोणती कागदपत्रे आवश्यक?
जर तुम्हाला या सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही टोल फ्री क्रमांक १४५५५ वर कॉल करून तुमची पात्रता तपासू शकता. जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही जवळच्या CSC केंद्रावर जाऊन तुमच्या कागदपत्रांसह अर्ज करू शकता. अर्ज करताना आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, रेशनकार्ड याशिवाय सक्रिय मोबाइल क्रमांक आवश्यक आहे.